Bhagat Singh Koshyari : राज्यपालविरोधाला पुन्हा धार
ताज्या
शहर
गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा
ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी
Bhagat Singh Koshyari : राज्यपालविरोधाला पुन्हा धार?
Published on : 29 November 2022, 1:48 am
By
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मुंबईच्या अस्मितेबाबत वादग्रस्त वक्तव्यांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजीनामा देत असल्याच्या अफवा पसरल्याने एकच गोंधळ झाला; पण कोश्यारी राजीनामा देणार नसल्याचे राजभवनातूनच आज स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या विरोधातील आंदोलनाची धार पुन्हा तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढल्याने राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सर्वस्तरातून टीकेची झोड उठली होती. त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदमुक्त करावे, अशीही मागणी होत होती. दरम्यान, आज त्यांच्या राजीनाम्याच्या अफवा पसरल्या. पदावर राहण्याची इच्छा नाही असे विधान कोश्यारींनी केले असल्याच्या चर्चेला आज अचानक उधाण आले. राज्यपालांनी चार महिन्यांपूर्वीच पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोलून दाखविले होते. मोदी राजभवनच्या नव्या इमारतीच्या पायभरणीसाठी आले असताना त्यांनी आपली आपली इच्छा बोलून दाखवली असल्याचे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आल्याची चर्चा आहे. त्यावर राजभवनाने स्पष्टीकरण दिले. राज्यपालांच्या राजीनाम्याचे वृत्त निराधार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले.
यापूर्वीही कोश्यारी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शांततेच्या भूमिकेबद्दल तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विवाहाच्या वयाबद्दल अनुचित विधाने करून जोरदार टीका ओढवून घेतली होती. अनेक संघटनांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलने करण्याची धमकी दिली, तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानेही त्यांच्या विरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान, राज्यपालांच्या शिवरायांबद्दलच्या विधानांमुळे त्यांना दिल्लीला बोलावून समज देण्यात आल्याचीही चर्चा होती. त्यानंतर राज्यपाल राजीनामा देऊन उत्तराखंडात आपल्या मूळ गावी जातील, अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या; मात्र आज राजभवनातर्फे स्पष्टीकरण देत या बातम्यांचा इन्कार करण्यात आला....मग राज्यपाल का नाही?राज्यातील सत्तारूढ भाजप तसेच बाळासाहेबांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या नेत्यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली नसली, तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आजही राज्यपालांवर टीकेचे सत्र सुरूच ठेवले आहे. पंडित नेहरू महाराष्ट्राची माफी मागू शकतात, तर राज्यपाल कोश्यारी कोण लागून गेले, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. शिवाजी महाराजांबाबत नेहरूंनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांनी १९५७ च्या सुमारास माफी मागितली होती, असेही राऊत यांनी दाखवून दिले.
Kripya news sahi lagaye