Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी, नाराजी दूर होणार?

in #pusad2 years ago

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होईल, याविषयी उत्सुकता असतानाच हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली. 'विस्तारानंतर सर्वच चर्चांना विराम मिळेल,' असेही जैस्वाल म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील, तसेच भाजपमधील आमदारांपैकी अनेक इच्छुक मंत्रीमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. विशेषतः शिंदे यांच्या पक्षातील आमदारांची अस्वस्थता सातत्याने दिसून येते. मंत्रीमंडळ विस्तारात कुणाला स्थान मिळेल, याची चर्चा होत असताना काही आमदार उघडपणे विस्तार होत नसल्याने नाराजीही व्यक्त करताना दिसत आहेत. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांप्रमाणेच महाविकास आघाडीतील नेत्यांचेही या मंत्रीमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले आहे. या विस्तारादरम्यानच शिंदे आणि भाजप यांच्या आघाडीमध्ये फूट पडणार, शिंदे यांच्या पक्षातील अनेक अस्वस्थ आमदार मंत्रीपद न मिळाल्याने पुन्हा एकदा बंडखोरी करणार, अशी वक्तव्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहेत. शिवाय शिवसेना नेत्यांनी सन २०२३मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार, असाही दावा केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जैस्वाल यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
नाराजी दूर होणार?
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा होण्यासही बरीच प्रतीक्षा करावी लागली होती. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच विस्तार होईल,' असे आशिष जैस्वाल म्हणाले. दरम्यान, पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये औरंगाबादचे संजय शिरसाट; तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची नाराजी वारंवार दिसून आली. बच्चू कडू यांनी तर मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेल्या किती आमदारांना आगामी टप्प्यात मंत्रीपद मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे.shinde-fadnavis-government-cabinet-expansion-95700120.jpg