राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; 14 ऑक्टोबरपर्यंत कडाडणार अन् गडगडणारही

in #yavtmal2 years ago

मुंबईसह राज्याला ऑक्टोबर महिन्यातही झोडपून काढलेल्या पावसाने रविवारी सुटी घेतली तरी १४ ऑक्टोबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. बहुतांशी जिल्ह्यांत विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

परतीचा पाऊस अद्यापही राज्यात दाखल झालेला नाही. तो गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यात आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याला लेटमार्क लागला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबादसह विदर्भातील जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शांत वारा, कमी विजा व गडगडाटविना असे थोडेसे वेगळे स्वरूप घेऊन होणारा पाऊस कदाचित आठवडाभर देशाच्या इतर जवळपास ७० टक्के भाग कव्हर करण्याबरोबरच महाराष्ट्रातही कोसळण्याची शक्यता जाणवते. हवामान बदलामुळे परतीचा पाऊस पुन्हा जागीच खिळलेला आहे. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी