ट्विन टॉवर'च्या जागी उभं राहणार भव्य मंदिर! रामलल्ला, भोलेनाथाची होणार स्थापना

in #yavtmal2 years ago

Twin Tower Demolition: उत्तर प्रदेशातील नोएडा येथे बांधण्यात आलेला ट्विन टॉवर रविवारी पाडण्यात आला. त्यानंतर त्या जागेवर काय बांधले जाणार, याबाबत RWA ची आज (गुरुवारी) बैठक झाली. या बैठकीत, ट्विन टॉवरच्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. या मंदिरात रामलल्ला आणि भगवान शंकर यांच्यासोबत इतर देवांच्या मूर्ती स्थापित केल्या जाणार आहेत. यासोबतच या जागेवर लहान मुलांना खेळण्यासाठी मोठे उद्यान तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये पर्यावरणपूरकतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

सोसायटीतील सर्व रहिवाशांची हीच इच्छा असल्याचे RWA ने बैठक बोलावून त्याबाबतची माहिती दिली. मात्र, सर्वात मोठी बाब म्हणजे सुपरटेकचा एमराल्ड टॉवर अद्याप सोसायटीच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. त्याची मालकी अद्याप बिल्डरकडे आहे आणि बिल्डरने तेथे कोणतेही बांधकाम केल्यास त्याला दोन तृतीयांश सोसायटीची संमती घ्यावी लागणार आहे. RWA च्या लोकांचे म्हणणे आहे की ते लोक पूर्णपणे RWA च्या पाठीशी आहेत आणि त्यावर पुन्हा कायदेशीर लढाई लढावी लागली तर ते तयार आहेत. हरित उद्यान व भव्य मंदिराचे नियोजन सोसायटीने अगोदरच केले असून, उद्यान उभारण्याचा निश्चय पक्का आहे. पर्यावरणाचा विचार करता उद्यानात जास्तीत जास्त हिरवळ असावी जेणेकरून लहान मुलांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही तेथे चांगला वेळ घालवता येईल.

ढिगाऱ्याचे पुढे काय होणार?

ट्विन टॉवर पाडल्यानंतर त्यात पडलेल्या ढिगाऱ्याची विल्हेवाट सेक्टर ८० येथील सीआयडी वेस्ट प्लांटमध्ये टाकण्यात येणार आहे. सेक्टर ८० सी अँड डी वेस्ट मॅनेजमेंट प्लांटमध्ये जाईल. हा प्लांट रॅमकी कंपनी चालवत आहे. नोएडामध्ये दररोज सुमारे २५० ते ३०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. आता या प्लांटमध्ये ट्विन टॉवरच्या ढिगाऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. ट्विन टॉवर साइटवरून दररोज २५० मेट्रिक टन डेब्रिज डंपरद्वारे साइटवर नेले जात आहे. यासाठी २० डंपर वापरण्यात आले आहेत. प्रति डंपर क्षमता १० ते १२ मेट्रिक टन आहे.

NGT च्या नियमांचे पालन करून, धूळ उडू नये म्हणून त्यावर ग्रीस शीट आणि पाणी टाकून या भंगाराची वाहतूक केली जात आहे, असे सांगण्यात येत आहे. ट्विन टॉवर्स पाडल्यानंतर उरलेला ढिगारा सुमारे ८० हजार मेट्रिक टन असल्याचा अंदाज आहे. यामध्ये ५२ हजार मेट्रिक टन मलबा तळघर आणि परिसरात भरण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तर २८ हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.