काँग्रेसमुळे माझे खूप नुकसान, तो पक्ष कधीच सुधारणार नाही”; प्रशांत किशोर यांनी सुनावले

in #yavtmal2 years ago

देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दारुण पराभव झालेल्या काँग्रेसमध्ये आताच्या घडीला मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. चिंतन शिबिरानंतर पक्षात नाराजांचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेनेही काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यसभा निवडणुकीवरूनही काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले आहे. तर दुसरीकडे हार्दिक पटेल १५०० समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यातच आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनीही काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. काँग्रेसमुळे माझे खूप नुकसान झाले. माझे रेकॉर्ड खराब झाले, त्या पक्षात कधी सुधारणार होईल असे वाटत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये हाजीपूर येथे प्रशांत किशोर बोलत होते. प्रशांत किशोर यांनी काही मुद्द्यांवर एकमत न झाल्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे नाकारले. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस पक्षामुळे माझे खूप नुकसान झाले. हा पक्ष म्हणजे बुडते जहाज आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे.

या पराभवानंतर खूप काही शिकलो

आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षामुळे माझे रेकॉर्ड खराब झाले. हा पक्ष स्वत:मध्ये सुधारणा करत नाही. त्यामुळे हा पक्ष आमचेही नुकसान करेल. काँग्रेसबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र सध्या काँग्रेसची हीच परिस्थिती आहे. मी २०११ ते २०२१ या काळात एकूण ११ निवडणुकांमध्ये काम केले. यामध्ये एका निवडणुकीसाठी मी यांच्यासोबत काम केले आणि ही निवडणूक हारलो. त्यामुळे मी तेव्हापासूनच ठरवले होते की, यापुढे काँग्रेससोबत काम करणार नाही. मात्र या पराभवानंतर मी खूप काही शिकलो, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. काँग्रेस पक्ष आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये याबाबत चर्चाही झाली होती. मात्र, काही विषयांवर एकमत न झाल्यामुळे काँग्रेसमध्ये सामील होणार नसल्याचे किशोर यांनी ट्विट करुन सांगितले होते. पक्षप्रवेश नाकारताना त्यांनी काँग्रेसला नेतृत्वाची गरज आहे आणि संघटनात्मक बदल करत पक्षामधील समस्या सामूहिकपणे दूर करणे आवश्यक असल्याचे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले होते.