सेना-संभाजी ब्रिगेड युतीवर बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, नक्कीच...
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरु झालेल्या राजकीय घडामोडींनी आता आणखी एक वेगळं वळण घेतलं असून आज शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युती करत असल्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परीषद घेत या युतीची घोषणा केली आहे. दरम्यान या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपने देखील या युतीच्या निर्णयावरून खोचक शब्दात निशाणा साधला आहे.
संभाजी ब्रिगेड सोबतच्या युतीची घोषणा केल्यानंतर भाजपने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांची ही नवी युती काँग्रेस-राष्ट्रवादी ला मान्य आहे का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केला आहे, त्यांनी ट्विट करत "माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती करताना नक्कीच शरद पवार आणि सोनिया गांधी यांना विश्वासात घेतले असणार. कारण या दोघांना विचारल्याशिवाय उद्धवजी काहीच करीत नाहीत." अशा शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे."२०१९ मध्ये उद्धवजी यांनी भाजपसोबत बेइमानी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत अभद्र युती केली. या अभद्र युतीमधून महाविकास आघाडी सरकार नावाची हिंदू विरोधी आघाडी जन्मास आली. परंतु उद्धवजी यांच्याच पक्षातील आमदारांना हे पटले नाही म्हणून त्या आमदारांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांची साथ सोडली आणि हे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाने भाजप सोबत आले." असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.पुढे त्यांनी उध्दव ठाकरे गटात उरलेल्या १५ आमदारांना देखील भाजपकडून डिवचण्यात आलं आहे. बावणकुळे यांनी केलेल्या या ट्विटमध्ये या आमदारांना देखील ही युती मान्य आहे का असा प्रश्न विचारला आहे. त्यांनी लिहिलं की, "आता उद्धवजी यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती केली. ही नवी युती उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिल्लक असलेल्या उर्वरित १५ आमदारांना मान्य राहणार आहे का? महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे यांची ही धडपड तर नाही ना?" असेही ते म्हणाले आहेत."उद्धव ठाकरे यांच्या या नव्या ब्रिगेडचे काँग्रेस पक्ष स्वागत करणार का?" असा सवाल त्यांनी कॉंग्रेस पक्षाला केला आहे, तसेच "वैफल्यग्रस्त झालेले उद्धवजी उद्या कुणासोबत युती करतील याची शाश्वती आता राहिलेली नाही." अशा खोचक शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.