बारामतीकर पवारांना सोडणार नाहीत; भाजपच्या मिशनवर खडाजंगी सुरू
NCP Jayant Patil Attack On BJP : आगामी लोकसभांच्या निवडणुकीसाठी भाजपने शरद पवारांचा गड असणाऱ्या बारामती मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. या सर्वामध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर टीका करत बऱ्याच लोकांनी बारामतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र, बारामतीकर शरद पवारांची साथ कधीच सोडणार नाही, असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे.पाटील म्हणाले की, यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये अनेकांनी खोदून पाहिलं मात्र पाणी लागलं नाही. त्यामुळे भाजपचा जो प्रयत्न आहे त्यात त्यांना यश मिळणार नाही असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे. बारामतीवर विजय मिळवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी लोकसेभेच्या निवडणुकीत बारामतीमध्ये विजयाचा नारळ फोडण्यासाठी भाजपकडून उत्तर प्रदेशातील अमेठी पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी 2014आणि 2019 मध्ये भाजपाने बारामतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात भाजपला यश मिळवता आले नाही. त्यामुळे आता अमेठी पॅटर्नचा वापर करून भाजप 2024 मध्ये पवारांच्या बारामतीत विजयी पताका फडकवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बारामतीत भाजपचा असा आहे प्लानलोकसभेतील विजयसाठी देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील राज्यांमध्ये भाजपला यश मिळवण्यासाठी अशा मतदार संघांमध्ये जोरदार काम केले जाणार असून, यासाठी राज्याच्या पातळीवर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपाचे माजी मंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. बारामतीमध्ये विजयी पतका फडकवण्यासाठी भाजपकडून आतापासूनच रणनीती आखण्यास सुरूवात करण्यात आली असून, त्यादृष्टीने भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बारामतीचा दौरा केला आहे. तर, येत्या 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान सीतारमण बारामती दौऱ्यावर येणार आहेत. बारामती विजयासाठी भाजपने 45 जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.