दोघांतील दुपारचा वाद शमला नव्हता, सायंकाळी धारदार शस्त्राने त्याने तरुणाला संपवलेच

in #yavatmal2 years ago

बेलकुंड (जि. लातूर) : किरकोळ कारणावरून एका २६ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याची घटना औसा तालुक्यातील टाका येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास एकाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीस अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता ११ ऑक्टोबरपर्यंत आरोपीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बाबाराव उर्फ शैलेश राम कांबळे (२६, रा. टाका, ता. औसा) असे मयताचे नाव आहे. टाका (ता.औसा) येथे शुक्रवारी दुपारी मयत बाबाराव उर्फ शैलेश कांबळे व आरोपी रवी बालाजी कांबळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. दरम्यान, बाबाराव उर्फ शैलेश हा गावातील ग्रामपंचायत कार्यालया शेजारील कट्ट्यावर बसला होता. दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी रवि कांबळे हा तिथे आला आणि त्याने बाबाराव याच्यावर सत्तूर या धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, रवि पसार झाला.

गंभीर अवस्थेत बाबाराव याला गावातील नागरिकांनी खाजगी वाहनातून लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत बाबाराव याचे आजोबा बिटू पाटोळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रवी कांबळे याच्याविरुध्द भादा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता आरोपीस ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास भादा पोलीस ठाण्याचे सपोनि विलास नवले हे करीत आहेत.

आणखीmurder-crime-abd-abd-a12_202209889791 (1).png