शेवगाव : कोरोना रोखण्यासाठी लस हीच मात्रा
शेवगाव : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर लसीकरणाची व्यापकता वाढवणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे. रुग्णसंख्या वाढत असली, तरी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. त्यामुळे फारसे चिंतेचे कारण नाही. मात्र तरीही सर्वांनी नियमांचे पालन करून सतर्कता बाळगत लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.शेवगाव येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, कोरोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी अत्यवस्थ व गंभीर रुग्णांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. बहुतांशी रुग्ण हे होम क्वारंटाईन व उपचार घेऊन बरे होत आहेत. मात्र तरी देखील चाचण्यांची संख्या वाढवून लसीकरण मोहीम अधिक व्यापक करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. वाढती रुग्णसंख्या ही ज्येष्ठ नागरिक, इतर गंभीर व्याधींनी ग्रस्त रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सर्वांनीच सतर्कता बाळगण्याची गरज आहे. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांनी खबरदारीचा बुस्टर डोस घ्यावा. लस न घेतलेल्यांनीही लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, तहसीलदार छगन वाघ, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संकल्प लोणकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे, डॉ. दीपक परदेशी, डॉ सुरेश पाटेकर, भागनाथ काटे आदींनी मंत्री राजेश टोपे यांचा सत्कार केला.पराभवावर पवार यांची प्रतिक्रिया बोलकीराज्यसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलकी प्रतिक्रिया देवून पुरेसे स्पष्टीकरण दिले आहे. कुठलेही मतदान म्हटले, तर तो व्यवस्थापन कौशल्याचा विषय असतो. त्यासाठी सर्व बाबींचा वापर करावा लागतो. मात्र झालेला पराभव स्वीकारून झालेल्या चुकांवर गंभीरतेने विचार केला जाईल. राजकारण हा सध्या सहजासहजी घेण्याचा विषय राहिलेला नाही.