अ. भा. साहित्य संमेलन भव्य झाले, दिव्य नाही; पैशाने सारे विकत घेता येत नाही

in #wardha2 years ago

image.png
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगर (वर्धा) - तुम्हारा लहेजा बता रहा हैं, तूम्हारी दौलत नई नई हैं! हा दोन ओळीचा शेर खूप बोलका आहे. पैसे जवळ आले म्हणजे सारे आल बेल करुन घेता येत नाही. बापू विनोबांच्या कर्मभूमी पार पडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनातून ते पुन्हा एकदा अधोरखित झाले. भक्कम आर्थिक पाठबळामुळे संमेलन भव्य झाले. मात्र आयोजनातील विविध उणीवांमुळे या भव्यतेला दिव्यतेची झालर लागू शकली नाही.

वर्धेच्या रामनगर परिसरात २६ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात साहित्य नगरी निर्माण करण्यात आली होती. या नगरीला राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगर असे नाव देण्यात आले होते. साहित्य संमेलनाचे हे ९६ वे आयोजन भव्य दिव्य व्हावे यासाठी सरकारने आर्थिक नव्हे तर दुसरीही हरसंभव मदत आयोजकांना केली होती. तब्बल दोन कोटींचे अनुदान दिले. गडकरी मेघेंचे पाठबळ वेगळे होते. बाकीही काही वेगळे अर्थमार्ग आयोजकांना येऊन भेटले होते.

शीर्षस्थ नेत्यांनी शब्द टाकून कुमार विश्वास सारख्या लोकप्रीय विख्यात साहित्यिकाला या संमेलनात बोलवून घेत संमेलनाला वेगळी श्रीमंती जोडली होती. त्यामुळे साहित्य नगरीतील विनोबा भावे सभामंडप, राम शेवाळकर व्यासपीठ, मनोहर म्हैसाळकर सभामंडप, देविदास सोटे कवी कट्टा, सुरेश भट गझल कट्टा, lमावशी केळकर तसेच अन्य सभा मंडप अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार झाले होते. ग्रंथ आणि पुस्तक प्रदर्शनीचा परिसरही प्रशस्तच बनविण्यात आला होता. हे सारे काही भव्यपणे साकारले, त्यामुळे आपसुकच त्याला दिव्यतेची जोड मिळेल, असा आयोजकांचा होरा होता. त्यामुळे आयोजक ओव्हर कॉन्फिडंट झाले. त्यांनी प्रत्यक्ष संमेलनाच्या अंमलपूर्तीसाठी मनात येईल तशा पद्धतीने आयोजन समित्या तयार केल्या.क्षमता नसणाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आणि येथूनच गडबड घोटाळा सुरू झाला. आयोजन सुरेख व्हावे याची काळजी न घेता 'अनेकांनी स्टाईल मे रहने का' फंडा अवलंबला. उणीवांकडे दुर्लक्ष करून खुशमस्करे पुढे पुढे करत प्रतिभावंतांना दुर्लक्षित करू लागल्यामुळे अनेक जण रुष्ट झाले.

साहित्य नगरीला जायचे नाही,अशी भूमिका घेतली. अनेकांनी फोनोफ्रेंड करत एकमेकांना आपली भावनाही बोलून दाखवली. त्यांची अनुपस्थिती आणि व्यक्त केलेल्या भावना या संमेलना भोवती नाराजीच वलय निर्माण करणाऱ्या ठरल्या. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी करणारे मोठे पांढरे शुभ्र सभामंडप आणि त्यात मोठ्या प्रमाणात श्रोत्यांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवण्यात आल्या असल्या तरी श्रोत्यांनी त्या दुर्लक्षित केल्या. परिणामी बोलणारे, सांगणारे आणि ऐकवणारे मोठ्या संख्येत असले तरी ऐकणारे पाहिजे त्या प्रमाणात उपस्थित नसल्याने हे सभामंडप ओशाळल्यासारखे झाले. परिणामी साहित्य नगरी भव्य दिसत असली तरी तिला दिव्यत्वाची जोड मिळू शकली नाही. एकूणच पैशाने सारे विकत घेता येत नाही, याची प्रचिती या संमेलनात पुन्हा एकदा आयोजकांसह अनेकांना आली.

स्टॉलधारकही दुर्लक्षित!

सारस्वतांच्या नगरीत जाऊन श्रीमंती पूजन करण्याचे अनेकांची योजना होती. त्यामुळे त्यांनी साहित्य नगरीत दोन हजारापासून पंधरा हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजली आणि आपल्या वेगवेगळ्या दुकानांसाठी स्टॉल विकत घेतले. मात्र आयोजकांनी त्यांना कोणतीही चांगली सुविधा उपलब्ध करून दिली नाही. सम्मेलन सुरू होण्याच्या पूर्वसंधेपासून तो समारोपापासून ते दुर्लक्षितच राहिले.