स्थानकांचे सुशोभीकरण; कोकणातील रेल्वे स्थानकांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश

in #pusad2 years ago

मुंबई : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे लवकरात लवकर सुशोभीकरण करण्याची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरू करावी, असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी दिले. तसेच लवकरच रत्नागिरी आणि कणकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलिस ठाणे उभारण्याची सूचनाही त्यांनी केली. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण आणि सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत ही घोषणा चव्हाण यांनी केली. मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांचे उत्कृष्ट सुशोभीकरण व अत्याधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे प्रवाशांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होतात. याच धर्तीवर कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांचे सुशोभीकरण व आधुनिकीकरण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मुंबई-कोकणातून दरदिवशी हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करतात. परंतु, रेल्वे स्थानकांवर, तसेच परिसरात कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना नेहमीच विविध हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. काही प्रमुख रेल्वे स्थानकांचा अपवाद वगळता कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे ही सर्व रेल्वे स्थानके लवकर सुसज्ज करावीत, या प्रक्रियेस विलंब न लावता येत्या सात दिवसांत याबाबत कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश चव्हाण यांनी दिले.