घर, ४ फास आणि ६ जणांचे शव; अंगाचा थरकाप उडवणारी घटना; पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा
उदयपूर : दिल्लीतील बुराडी घटनेच्या हृदयद्रावक आठवणींना उजाळा देणारी एक भयानक घटना राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात समोर आली आहे. बुराडीच्या घरातील असे दृश्य जिथे एकाच घरात १० लोकांचे मृतदेह फासावर लटकत होते. उदयपूरच्या गोगुंडा तहसीलमधील एका गावात सामूहिक मृत्यूची अशीच घटना समोर आली आहे.
पती-पत्नी आणि ४ निष्पाप मुलं...
उदयपूरच्या गोगुंडा तालुक्यात एक गाव आहे. नाव गोल नेडी. गावातील लोकही शेती करतात आणि बरेच लोक शहरात जाऊन काम करतात. त्याच गावात एक कुटुंब होतं. जे आदिवासी समाजातून येतं. प्रकाश गमेती असे कुटुंबप्रमुखाचे नाव होतं. त्यांच्या पत्नीचे नाव दुर्गा गमेती होते. दोघांना चार मुले होती. अवघ्या ३ ते ४ महिन्यांचा गंगाराम, ५ वर्षांचा पुष्कर, ८ वर्षांचा गणेश आणि ३ वर्षांचा रोशन.
सकाळी घरी पोहोचला भाऊ अन्...
वास्तविक हे कुटुंब गावातील शेताच्या टोकाला बांधलेल्या घरात राहायचं. तिथे प्रकाश आणि त्यांच्या दोन भावांची घरे शेजारी शेजारी बांधली होती. प्रकाश हा गुजरातमध्ये काम करायचा. सोमवारीही रोजप्रमाणेच लोकांची सकाळपासूनच कामं सुरू झाली. प्रत्येकजण आपापल्या कामाला जायला तयार होत होता. अशात प्रकाश यांचा भाऊ त्यांच्या घरी आला. त्याने दार ठोठावले. पण कोणीच दरवाजा उघडला नाही.
घरात लटकले होते ४ मृतदेह...
प्रकाशच्या भावाला काळजी वाटू लागली. तो आरडाओरडा करून दार वाजवत असल्याचे पाहून गावातील लोकही तिथे जमा झाली. यानंतर सर्वांनी मिळून दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला आणि दरवाजा तोडला. दरवाजा उघडताच गावकऱ्यांनी स्वप्नातही समोरच्या दृश्याची कल्पना केली नसेल. घराच्या आतील छताला चार मृतदेह लटकले होते आणि दोन मृतदेह जमिनीवर पडले होते. हे भयानक दृश्य पाहून ग्रामस्थ आणि प्रकाशचा भाऊ घाबरले.