महाराष्ट्र-बिहारनंतर आणखी एका राज्यात सत्तासंकट, 40 आमदार रिसॉर्टवर!
रायपूर, 30 ऑगस्ट : महाराष्ट्र आणि बिहारमध्ये (Maharashtra Politics) सत्तानाट्य घडल्यानंतर आता आणखी एका राज्यामध्ये सत्तासंकट ओढावलं आहे. झारखंडमधला (Jharkhand) सत्ताधारी पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि काँग्रेसने त्यांच्या 40 आमदारांना विशेष विमानाने रायपूरला पोहोचवलं आहे.
काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आमदारांना नवा रायपूरच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. या आमदारांची जबाबदारी कर्मकार मंडळाचे अध्यक्ष सन्नी अग्रवाल, राज्य खनिज विकास निगमचे अध्यक्ष गिरीश देवांगन आणि नागरिक आपूर्ती निगमचे अध्यक्ष राम गोपाल अग्रवाल यांना देण्यात आली आहे. रिसॉर्टवर आमदारांच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रिसॉर्टच्या आतमध्ये जाण्याची परवानगी कोणालाही देण्यात येत नाहीये.
तीन लेयरच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये तिसऱ्या लेयरमध्ये ASP स्तराचे अधिकारी, दुसऱ्या स्तरावर CSP यांना जबाबदारी देण्यात आली आहे. 'कोणतीही अनहोनी होणार नाही, प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. रणनिती म्हणून आमदारांना रिसॉर्टवर ठेवण्यात येत आहे. याच रणनितीची छोटीशी झलक सगळ्यांनी आज बघितली.
पुढेही अनेक गोष्टी बघायला मिळतील. राज्यामध्ये षडयंत्र करणाऱ्यांना प्रत्युत्तर मिळेल,' असं मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले. हेमंत सोरेन अडचणीत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना अपात्र करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर झारखंडमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दार यांनी या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दावा केला होता की, सोरेन यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग गेला आहे आणि यात हितसंबंध आणि भ्रष्टाचार या दोन्हींचा समावेश आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या वादाची दखल घेत निवडणूक आयोगाने मे महिन्यात सोरेन यांना खाण भाडेतत्त्वावर घेण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती.
लाइक करे