आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज, बळीराजाच्या चिंतेत वाढ

in #new2 years ago

image.png
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. राज्यातील अनेक भागामध्ये गारपीठ झाली आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कारण अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर राज्यात आजही वर्तवलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. 20 मार्चपर्यंत म्हणजे आणखी पुढचे तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर परभणी जिल्ह्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.20 मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता अधिक जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.दरम्यान, परभणी जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, परभणी, गंगाखेड तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे. वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील उखळी येथील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बाळासाहेब बाबुराव फड (वय 60), परसराम गंगाराम फड (वय 40) अशी मृतांची नावे आहेत. तर परभमी तालुक्यातही दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर राहीबाई बाबुराव फड (75 वर्षे), सतीश सखाराम नरवाडे (29 वर्षे), राजेभाऊ किशन नरवाडे (35 वर्षे) हे जखमी झाले आहेत.