न्यायालयीन साक्ष टाळू नको भावा; खावी लागेल पोलीस कोठडीची हवा
अनेकांकडून न्यायालयीन साक्ष टाळली जाते. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून कायदेशीर कार्यवाही करून अटक वाॅरंट जारी केले जातात. या वाॅरंटची अंमलबजावणी करून पिंपरी-चिंचवडपोलिसांनी सहा महिन्यांत ४३० जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे न्यायालयीन साक्ष टाळून वाॅरंटला हलक्यात घेणाऱ्यांना आता महागात पडणार आहे.
विविध गुन्हे तसेच खटल्यांमध्ये आरोपी, साक्षीदार तसेच तपास अधिकारी यांची न्यायालयीन साक्ष होते. मात्र, त्यासाठी काही जण न्यायालयात हजर होत नाहीत. परिणामी संबंधित प्रकरणाचे न्यायालयीन कामकाज प्रलंबित राहून ‘तारीख पे तारीख’ सुरू होते. न्यायालयाकडून समन्स बजावले जातात. त्यानंतरही न्यायालयीन साक्ष टाळल्यास जामीनपात्र वाॅरंट बजावला जातो. त्यानंतरही संबंधित व्यक्ती न्यायालयात हजर न राहिल्यास अटक वाॅरंट जारी