भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त
दलालांच्या मनमर्जीने चालतो भुमिअभिलेखचा कारभार
यवतमाळ प्रतिनिधी दि २३ -:येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयात मालमत्ताधारकांना हेलपाटे मारावे लागतात.या कार्यालयाशी संबंधित कुठल्याही कामासाठी अडवणूक होते. खासगी लोकांचा वावर वाढला असल्याने समस्येमध्ये आणखी भर पडली आहे. आर्थिक लाभाची कामे मात्र तातडीने निकाली काढली जातात. हा प्रश्न यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीने उचलून धरला आहे. यासंदर्भात भूमिअभिलेख अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.भुमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातून मिळकत पत्रिका, फेरफार नोंद, सातबारा, प्लॉटची मोजणी, टिपण उतारा आदी प्रकारचे कागदपत्र मिळण्याकरिता कालावधी निश्चित करून देण्यात आला आहे.याची या कार्यालयाने पूर्णतः वाट लावली आहे. कर्मचाऱ्यांना विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली.
जातात. कर्ज तसेच बोझ्याची प्रकरणे विनाविलंब निकाली निघतात.भूमिअभिलेख अधीक्षकांना निवेदन देताना शहर काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, उषा दिवटे, कैलास सुलभेवार, पल्ल्वी रामटेके, शीला इंगोले, वैशाली सवाई, दर्शना इंगोले, विशाल पावडे आदी उपस्थित होते.
बाहेरच्या व्यक्ती हाताळतात महत्त्वाचे दस्तावेज
भूमीअभिलेखमध्ये बाहेरच्या व्यक्तींचा वावर वाढला आहे. अतिशय महत्त्वाचे दस्तावेज त्यांना हाताळायला दिले जातात. हा प्रकार नित्याचा झाला आहे. याविषयी उपअधीक्षकांना सांगूनही उपयोग होत नाही. यावर नियंत्रण आणण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याच कार्यालयांतर्गत हिवरी येथे कुठल्याही प्रकारच्या शुल्काची पावती दिली जात नाही.