Rajiv Gandhi हत्येतील नलिनी गांधी परिवाराची भेट घेणार? म्हणाली, माझा नवरा जिथं जाईल तिथं..
माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येप्रकरणी नलिनी श्रीहरन (Nalini Sriharan) आणि इतर दोषींची शनिवारी तामिळनाडू तुरुंगातून सुटका करण्यात आली. हे सर्व दोषी 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होते.
तुरुंगातून सुटल्यानंतर नलिनीनं तामिळनाडू (Tamil Nadu) आणि केंद्र सरकारचे आभार मानले. ती म्हणाली, 'मी निर्दोष आहे. या ठाम विश्वासानंच मला इतकी वर्षे जिवंत ठेवलं.' वेल्लोर तुरुंगातून सुटल्यानंतर लगेचच नलिनी वेल्लोर सेंट्रल जेलमध्ये (Vellore Central Jail) गेली, जिथून तिचा पती व्ही. श्रीहरन उर्फ मुरुगनची सुटका झाली. नवऱ्याला भेटल्यानंतर नलिनी खूप भावूक झाली होती.
हेही वाचा: Patanjali Medicines Ban : योगगुरू बाबा रामदेवांना मोठा धक्का; पतंजलीच्या 5 औषधांवर बंदी!
नलिनी म्हणाली, मी 32 वर्षांत तुरुंगातला नरक अनुभवलाय. मात्र, माझ्यातल्या विश्वासानं मला इतकी वर्षे जिवंत ठेवलं आहे. कारण, मी निर्दोष आहे. तुरुंगात नियमितपणे योगा केल्याने मी स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकले.' आता आपली सुटका झालीय, तुम्ही गांधी कुटुंबातील (Gandhi Family) कोणाला भेटणार आहात का? असं विचारलं असता नलिनी म्हणाली, माझी अशी कोणताही योजना नाहीये. माझा नवरा जिथं जाईल तिथं मी जाईन,' असंही तिनं सांगितलं.