Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचे थैमान; सोयाबीन, भात, भुईमूग
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या धुवाँधार पावसाने अनेकांची दाणादाण झाली. कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने हाता तोंडाला आलेल्लया पिकांची नासाडी होण्याची भीती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी तब्बल चार तास पाऊस कोसळला. करवीर, हातकणंगले शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यात पावसाने काल अक्षरश: थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे.
राधानगरी धरणात 231.46 दलघमी पाणीसाठा झाला आहे. धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी, रुई व तेरवाड हे तीन बंधारे पाण्याखाली आहेत. यंदाच्या मोसमात कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थितीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नव्हती. तसेच जून महिन्यातील अपवाद वगळल्यास पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. तथापि, परतीच्या पावसाने मात्र आता रौद्ररुप धारण केल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.