सरकारकडून शिक्षणाच्या आयचा घो! सांगा, त्या चिमुकल्यांनी शिकायचं कुठं?
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि काहीतरी वेगळे करण्यासाठी शिक्षण हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. शिक्षणाचा काळ हा सर्वांसाठी, सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्वाचा काळ असतो. त्यामुळेच आपल्या जीवनात शिक्षणाचं खूप महत्त्व आहे. अलीकडे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा देखील सुधारला आहे. प्राथमिक शिक्षण हा पुढील शिक्षणाचा पाया आहे. परंतू, ही गोष्ट राज्यकर्त्यांच्या डोक्यात कधी उतरणार हा प्रश्न आज सामान्य जनतेला पडलाय. कारण सरकार जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा सरकार विचार करत आहे. त्यासाठी सरकारकडून 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचा आढावा घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. परंतू, या शाळा बंद झाल्या तर त्याचे होणारे परिणाम किती भयानक असतील याचा विचारही करता येत नाही.