Bacchu Kadu : ठाकरेंनी चोळलं बच्चू कडूंच्या जखमेवर मीठ; म्हणाले आम्ही तर मंत्री...
मुंबई - उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची आज बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार आणि भाजपवर कडाडून टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या जखमेवर मीठ चोळलं. (Uddhav Thackeray attack on Bacchu Kadu)
हेही वाचा: आता उद्धव ठाकरेचंही 'लाव रे ती क्लिप'! देवेंद्रजी, लाज बाळगा म्हणत केली कडाडून टीका
उद्धव ठाकरे म्हणाले की, विदर्भात बैलांना सजवलं होतं आणि त्या बैलांवरती लिहलं होतं पन्नास खोके एकदम ओखे. तुमच्या विदर्भातलेच एक नेते ज्यांना आपण आपल्या मंत्रिमंडळात मंत्री केलं होतं. पण त्यांना ते पचलं नाही. समोर ताट वाढलेलं होतं. पण ते पचवता आलं नाही. आता फिरतायेत सगळीकडे. याच बच्चू कडूंनी सांगितलं की, आम्ही लग्नात गेलो तरी लोक खोकेवाले आले म्हणतात, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, तुम्ही पन्नास पन्नास खोके घेतले, त्यापैकी काही खोके या माझ्या शेतकऱ्याला दिले तर त्याचा जीव वाचवू शकतो, त्याची शेती वाचवू शकते. मात्र या सरकारकडून काही आशा अपेक्षा राहिलेली नाहीये. या गद्दारांचं खाली डोकं वर पाय करणार का, असा प्रश्न उद्धव यांनी यावेळी उपस्थितांना विचारला.