Gram Panchayat Election 2022 : ५१ ग्रामपंचायतींसाठी वाजला बिगुल
रत्नागिरी : ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला मतदान होईल. यात जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचे निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आले. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील एक हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आला. यात संबंधित तालुक्यातील तहसीलदार १३ सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुटीमुळे २४ व २५ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. याची छाननी २८ सप्टेंबरला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरला दुपारी तीनपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.