आजीने ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता, देशाची माहिती नाही, पण राहुलजींची मात्र नक्की हटली”
आताच्या घडीला संपूर्ण देशभरात विविध कारणांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जाणाऱ्या भारत जोडो यात्रेला सुरूवात केली आहे. १५० दिवसांच्या या भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली असून, भाजपही याला प्रत्युत्तर देत आहे. यातच राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनीही यात उडी घेत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांच्या एका पत्रकार परिषदेनंतर भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींच्या टीशर्टवरून निशाणा साधला. भाजपने ब्रँडसोबत राहुल गांधी यांचा त्या टीशर्टमधील फोटो आणि टीशर्टचा फोटो शेअर केलाय. या टीशर्टची किंमत ४१,२५७ रूपये असल्याचा आरोप भाजपने केलाय. यावर भाजपने जोरदार घणाघात ‘भारत देखो’ असे म्हटलेय. यानंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
देशाची नाही, पण राहुलजींची गरिबी नक्की हटली
अतुल भातखळकर यांनीही ट्विटरवर एक फोटो शेअर करत, १९७१ साली राहुलजींच्या आजीने "गरिबी हटाव" चा नारा दिला होता. देशाची गरीबी हटली की नाही माहित नाही पण राहुलजींची मात्र नक्की हटली, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. यानंतर काँग्रेसने पलटवार केला आहे. भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांना पाहून घाबरलात का? मुद्द्याचे बोला. बेरोजगारी आणि महागाईवर बोला. कपड्यांची चर्चा करायची असेल तर मोदींच्या १० लाखांचा सूट आणि १.५ लाखांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल. सांगा यावर बोलायचे आहे का?, असा इशारा काँग्रेसने दिला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट आणि चष्माही पाहिला आहे. भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीती निर्माण झाली असल्याची टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली.
आणखी वाचा