एक विवाह ऐसा भी! रात्री सप्तपदी घेतले अन् सकाळी लग्नच मोडले; नववधूचं कारण ऐकून बसेल धक्का

in #yavtmal2 years ago

नवी दिल्ली - देशात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. याच दरम्यान अनेक अजब घटना समोर येत आहेत. अनेक हटके व्हिडीओ आणि भन्नाट किस्से पाहायला मिळत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका नववधूने रात्री सप्तपदी घेतले आणि सकाळी चक्क लग्नच मोडलं आहे. नवरीने लग्नानंतर काहीच वेळात नवरदेवासोबतचं नातं तोडलं. नवरदेवाचं वय खूप जास्त आहे असं तिने म्हटलं आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील चौबेपूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कादीपूर खुर्द गावातील चौहान वस्तीमध्ये एक लग्न होतं. वाराणसीच्या संकटमोचन परिसरातून गावात वरात पोहोचली आणि नवरी नवरदेवाने हिंदू रितीरिवाजानुसार सप्तपदी घेतले. प्रथा आणि परंपरेनुसार हे लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. सोमवारी मात्र जेव्हा पाठवणीची तयारी सुरू झाली तेव्हा नवरीने नवरदेवासोबत जाण्यास नकार दिला. नवरदेवाचं वय खूप जास्त आहे असं तिचं म्हणणं होतं.

चौबेपूर ठाण्यात हे प्रकरण पोहोचलं. नवरी आणि नवरदेव दोन्हीकडच्या लोकांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. मात्र नवरीच्या हट्टापुढे काहीच होऊ शकलं नाही आणि हे लग्न मोडलं. कादीपूर खुर्द गावात राहणारी राजा बाबू चौहान यांची मुलगी काजल हिचं लग्न साकेत नगर संकटमोचन वाराणसी येथील संजय चौहान नावाच्या व्यक्तीसोबत ठरलं होतं. 5 जून रोजी गावात लग्नाचे सगळे विधी पार पडले.

सोमवारी सकाळी पाठवणीच्या वेळी जेव्हा सगळं सामान ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये टाकण्यात आलं तेव्हा अचानक नवरीने नवरदेवासोबत जाण्यास नकार दिला. यावरुन वर आणि वधू दोन्ही पक्षात वाद सुरू झाला आणि प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. पोलिसांना दोन्हीकडील लोकांना आपसात बोलून काहीतरी मार्ग काढण्याचा सल्ला दिला. बराच वेळ चर्चा सुरू होती मात्र नवरीच्या हट्टापुढे कोणाचं काहीच चाललं नाही. अखेर नवरदेवाला नवरीशिवायच आपली वरात घेऊन घरी परतावं लागलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.