राज्यात नवे सरकार येणार की राष्ट्रपती राजवट लागणार?

in #yavtmal2 years ago

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार कायम राहणार? भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा गट असे मिळून सरकार येणार की राष्ट्रपती राजवट लागणार? अशा विविध शक्यतांभोवती राज्याचे राजकारण आता फिरत आहे.

शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे ३७ आमदार बाहेर पडले, तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांची आमदारकी कायम राहील. त्या परिस्थितीत शिंदे हे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र देतील व आपल्या गटाला मान्यता द्यावी, अशी मागणी करतील. त्यापेक्षा कमी आमदार शिंदे यांच्यासोबत असले तरी त्यांना पक्षातून काढून टाकणे शिवसेनेला शक्य नाही; कारण पक्षाने त्यांची हकालपट्टी केली तरी त्यांची आमदारकी कायम राहते व त्या परिस्थितीत ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात.

राज्यात घटनात्मक यंत्रणेस अपयश येताना दिसत आहे, सत्तापक्षाकडे बहुमत आहे की नाही, हेही स्पष्ट होत नाही आणि एकूणच गोंधळाची स्थिती आहे, असे कारण देत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल हे राष्ट्रपतींकडे करू शकतात. राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यात आणखी काही राजकीय परिस्थिती निर्माण होईल. बहुमताचा दावा भाजपकडून केला जाईल. सर्वांत मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करतील, अशीही एक शक्यता आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३७ आमदार खरेच राहिले तर भाजपचे १०६ अधिक त्यांच्यासोबतचे १३ अपक्ष असे १५६ संख्याबळ होते. सत्तास्थापनेसाठी १४५ इतकेच संख्याबळ लागते.

एकनाथ शिंदेंना लगेच का हटवले?- शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने लगेच का हटविले? कारण शिंदे यांना पदावर कायम ठेवले तर ते पक्षाच्या आमदारांना प्रतोदामार्फत व्हिप जारी करू शकतात, जो कायद्याने आमदारांना बंधनकारक असेल. त्यांच्या जागी शिवसेनेने अजय चौधरी यांना गटनेतेपद दिले आहे. त्यासाठी झिरवळ यांना जे पत्र देण्यात आले, त्यावर विधानसभेच्या तीस सदस्यांच्या सह्या असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे; पण प्रत्यक्षात त्यावर १७ सह्या असल्याचे म्हटले जाते. - केवळ १७ सह्या असतील तर ५५ पैकी बहुमताने आमदार हे शिंदे यांच्यासोबत आहेत, असे सिद्ध होईल आणि त्या परिस्थितीत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, अशी मान्यता विधानसभा उपाध्यक्षांना देऊ शकतील.