Karnataka : किनारपट्टी भागाला अतिवृष्टीचा इशारा; शाळा-कॉलेज बंद

in #yavatmal2 years ago

कर्नाटक : नैऋत्य मान्सून (Monsoon Season) देशभरात सक्रिय झालाय. विशेषत: देशाच्या दक्षिणेकडील भागात मान्सूनचे ढग मुसळधार पाऊस पडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात (Karnataka) मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, आज (गुरुवार) राज्याच्या किनारपट्टी भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. आयएमडीनं (IMD) दिलेल्या इशाऱ्यानंतर, सुरक्षेच्या दृष्टीनं आज शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. इथं भूस्खलनाच्या घटनेत तिघांचा मृत्यूही झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील मंगळुरु (Mangalore) जिल्ह्यात दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झालाय. बुधवारी रात्री 8.45 च्या सुमारास ही घटना घडलीय. हेनरी कार्लो या व्यक्तीच्या शेतामध्ये केरळातील पाच मजूर काम करत होते. यादरम्यान दरड कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला, तर तिघंजण चिखलात अडकले. अग्निशमन दलानं इतर तिघांना वाचवण्यात यश मिळविलं. मात्र, आज सकाळी यातील दोघांचा मृत्यू झालाय. पलक्कडमधील 45 वर्षीय बिजू, कोट्टायम येथील 46 वर्षीय बाबू आणि अलाफुझा येथील 46 वर्षीय संतोष अशी मृत मजुरांची नावं आहेत. दरम्यान, कन्नूर येथील 44 वर्षीय जॉनीवर उपचार सुरू आहेत.भारतीय हवामान खात्यानं (Indian Meteorological Department) पुढील दोन दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीय. दक्षिण कन्नड जिल्ह्यात 204.5 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. संततधार पावसामुळं कर्नाटकातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय. उडुपी, कोडागु, हसन आणि उत्तर कन्नडच्या जिल्हा प्रभारी अधिकाऱ्यांनी अंगणवाडी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीय. शिवाय, हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कुल्लू आणि शिमला इथं मुसळधार पावसामुळं अचानक आलेला पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये बुधवारी पाच जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण बेपत्ता झाले होते.