BDD चाळींना मिळणार बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचं नाव
मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींच्या नामकरणाबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता वरळीतील बीडीडी चाळ बाळासाहेब ठाकरे नगर, नायगावची बीडीडी चाळ शरद पवार नगर तर ना. म. जोशी बीडीडी चाळ आता राजीव गांधी नगर या नावाने ओळखली जाणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या नामकरणाची घोषणा केली होती. त्यानंतर अखेर या नामकरणासंबंधीता शासन निर्णय जारी करण्यात आला दरम्यान, मुंबईतील बीडीडी पोलीस वसाहतीत अनेक कुटुंब वर्षानुवर्षे राहत आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर राज्य सरकारने निर्णय घेत पोलिसांना हे घर 50 लाख रुपये बांधकाम खर्चात मिळेल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. परंतु यावरुन राजकारण सुरु झाले.याशिवाय मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती 100 वर्षांहून अधिक जुन्या असून, जुन्या झालेल्या इमारतीचा पुर्नविकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, मुंबईबाहेर एसआरए योजना लागू करणे, म्हाडाच्या जागांवर आलेले अतिक्रमण हटवणे, धारावी व बीडीडी चाळीचा पुर्नविकास या गोष्टी सरकारच्या अजेंड्यावर आहेत